एवढी पुस्तकं वाचणार कधी?

पाच-सातशे पुस्तके असतील माझ्या संग्रहात फारतर. पण माझी अभ्यासिका भरायला तेवढीही पुरेशी आहेत. तेवढीच पुस्तके पाहून लोक मला विचारतात- “एवढी सगळी पुस्तकं तुम्ही वाचली आहेत?” कोणी म्हणतं- “एवढी पुस्तकं तुम्ही वाचणार कधी?”

त्यांच्या परीने त्यांचे प्रश्न बरोबर आहेत पण त्यांना काय सांगावं हाच मला प्रश्न पडतो. पुस्तकं का जमवायची, किती जमवायची, का वाचायची आणि वाचून काय करायचं- हे प्रश्न ज्या पिढीला पडतात तिच्या सांस्कृतिक पातळी बद्दल न बोललेलंच बरं. मला ओरडून सांगावेसे वाटते- “बाबांनो, मला आवडतं, आनंद होतो म्हणून मी वाचतो. पुस्तकांचा सहवास, स्पर्श, त्यांचा गंध, हे सर्व आवडतं मला. आणि मुख्य म्हणजे खामगाव सारख्या छोट्या शहरात मला हवी असलेली किंवा नवीन अशी इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत पुस्तकं उपलब्ध करून देणारं समृद्ध ग्रंथालय नाही. मग पुस्तक विकत घेण्याशिवाय पर्याय नसतो. आणि ग्रंथालय असतं तरी मी पुस्तकं विकत घेऊनच वाचली असती. कारण चांगली पुस्तकं म्हणजे संपत्ती आणि संपत्ती स्वतःची असली तरच तिचा मनसोक्त उपभोग घेता येतो आणि तिची ऐट मिरवता येते. माझ्या वाचनाचा वेग माझ्या पुस्तक खरेदीच्या वेगापेक्षा अर्थातच कमी आहे. तसा तो सर्वच ग्रंथाप्रेमींचा असतो. मी कुठेतरी वाचलं होतं कि माणूस आयुष्यभरात सहा-सात हजार पुस्तकं वाचू शकतो. हे खरं असेल तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास ४४०००, डॉ. रा. चिं. ढेरे यांनी जवळजवळ ४०००० आणि त्याहून वरचढ म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक श्यामलाल यांनी तब्बल नव्वद हजारांच्या वर पुस्तकं जमवली होतीच ना? पाश्च्यात्यांचे ग्रंथप्रेम तर आपल्यापेक्षा खूप जास्त आणि खूप श्रेष्ठ प्रतीचे आहे. त्यांच्याकडे तर अशी उदाहरणे खो-यांनी सापडतील. उम्बर्तो इको या इटालियन समीक्षकाकडे तीस हजारांचा समृद्ध ग्रंथसंग्रह होता. निस्सीम तालेब हा लेखक न वाचलेल्या पुस्तकांना anti-library म्हणतो. असा समृद्ध ग्रंथसंग्रह आजूबाजूला असला म्हणजे माणूस सतत एका अभिरुचीसंपन्न सहवासात व सुखावह अशा वातावरणात असतो. आपल्याला अनेक गोष्टी माहीत नाहीत, अनेक क्षेत्रे आपल्यासाठी अज्ञात आहेत, अनेक पुस्तके आपल्याला अजून वाचायची आहेत याचे भान त्याला सदैव असते. आपल्या अज्ञानाची जाणीव त्याला सावध ठेवते. मनाला कोतेपण येऊ देत नाही.

आता राहिला प्रश्न वाचून काय करायचं हा. तर काही साध्य करण्यासाठीच वाचावं असं काही नसतं आनंदासाठीही वाचायचं असतं. आजच्या जगात निखळ आनंदासाठी सुद्धा काही करायचं असतं ही कल्पनाच लोकांना करवत नाही. वाचणे, संगीत ऐकणे, मित्रांमध्ये रमणे, निसर्गात रमणे या आणि अशा गोष्टी केवळ आनंदासाठी करायच्या असतात ही कल्पनाच आपल्या पिढीच्या लोकांसाठी अपरिचित आहे. निखळ आनंदासाठी वाचावे. इतर साध्य तर असतातच मग. कधी संशोधनासाठी, कधी माहितीसाठी, कधी लिहिण्यासाठी, कधी एखाद्या विषयाचा विशेष अभ्यास करण्यासाठी वाचावं लागतंच. पण सर्वोच्च व अभिजात स्वरूपाचा आनंद मिळतो तो अहेतुक वाचनातून. कोणाला हा आनंद कथा-कादंबऱ्यातून मिळेल, कोणाला कवितेतून, नाटकातून किंवा इतर ललित साहित्यातून मिळेल किंवा कोणाला इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान किंवा राजकारणाबद्दल वाचून मिळेल. त्यांची जातकुळी मात्र सारखीच. मला हे कळतं की मी कदाचित आयुष्यात जमवलेली सर्वच पुस्तकं वाचू शकणार नाही. पण तरीही मी पुस्तकांचा संग्रह करणे सोडणार नाही. ज्याप्रमाणे आपण श्वासांचा हिशेब मांडून ठेवत नाही, तसा वाचनातून होणाऱ्या नफा-नुकसानीचा ही ताळेबंद मांडू नये. निखळ आनंदासाठी करावयाच्या ज्या गोष्टी असतात त्या हिशेबाच्या पलीकडे असतात. त्यांना हिशेबाच्या पलीकडेच ठेवावे. आणि हो, हा आनंद वाटायला विसरू नये. वाटल्याने तो शतपटीने वाढतो.

प्रज्ञावंताच्या सहवासात…

sangatनरहर कुरुंदकरांनी महाराष्ट्राला विचार करायला शिकवले. हा असामान्य प्रतिभावंत, प्रज्ञावंत महाराष्ट्राच्या वैचारिक क्षितिजावर जवळजवळ पस्तीस वर्षे तेजाने तळपला आणि अकाली अस्ताला गेला. साहित्य, कला, राजकारण, इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान या सर्वच क्षेत्रांमध्ये सहज व अव्याहत संचार करणारी मूलगामी चिकित्सक बुद्धी नरहर कुरुंदकरांना लाभली होती. कोणताच विषय त्यांना वर्ज्य नव्हता. त्यांच्या बुद्धिमत्तेची कक्षा स्तिमित करणारी आहे.

कुरुंदकर गुरुजींचे विचारधन त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध आहेच, पण गेल्या काही वर्षात कुरुंदकरांचे काही अप्रकाशित लिखाणसुद्धा प्रकाशित होत आहे, ही आनंदाची बाब आहे. कुरुंदकर यांचे चिरंजीव विश्वास कुरुंदकर यांनी ‘निवडक नरहर कुरुंदकर’ या शीर्षकाची एक ग्रंथमाला प्रकाशित करण्यास सुरुवात केली आहे या ग्रंथ माले तले ‘निवडक नरहर कुरुंदकर : व्यक्तिवेध’ तसेच ‘ग्रंथवेध भाग १ व २’ हे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यातच नरहर कुरुंदकरांचे मित्र व सहाध्यायी मधु कुरुंदकर यांनी लिहिलेल्या ‘संगत नरहरची’ या दुर्मिळ झालेल्या ग्रंथाच्या नव्या आवृत्तीची भर पडली आहे. ‘संगत नरहरची’ हे पुस्तक मधु कुरुंदकरांनी सर्वप्रथम १९९४ मध्ये लिहिले व ते संगत प्रकाशन, नांदेड यांनी प्रकाशित केले. त्यानंतर २००३ साली या पुस्तकाची वाढीव व सुधारित अशी दुसरी आवृत्ती स्वतः लेखकानेच सत्संगत प्रकाशन या स्वतःच्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून प्रकाशित केली. ही आवृत्ती संपून बरीच वर्षे झाली होती व हे पुस्तक दुर्मिळ झाले होते. तसेही प्रकाशनात असतानासुद्धा ते बृहन्महाराष्ट्रातील सर्व कुरुंदकरप्रेमींपर्यंत पर्यंत पोचू शकले नव्हते. आता मात्र साधना प्रकाशनाने या पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित केली आहे.

पहिल्या आवृत्तीला प्राचार्य राम शेवाळकर यांनी लिहिलेली प्रस्तावना याही आवृत्तीत आहे. प्रस्तावनेमध्ये प्राचार्य शेवाळकरांनी या पुस्तकातील अनेक आठवणी आपल्यालाही आधी ज्ञात असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पुस्तकाची विश्वासार्हता अधिकच वाढली आहे. मधु कुरुंदकर हे नरहर कुरुंदकरांचे आप्त तसेच सहाध्यायी व मित्र. बालपणापासून दोघे सोबत खेळले, वाढले. मॅट्रिकच्या अभ्यासासाठी म्हणून मधु कुरुंदकर यांना नरहर कुरुंदकरांसोबत हैदराबाद येथे शिकण्याचा व राहण्याचा योग आला. इथून पुढे जवळजवळ शिक्षण पूर्ण होईपर्यंत दोघे सोबत होते. एक विद्वान, विचारवंत व प्रतिभावंत म्हणून नरहर कुरुंदकर कसे घडत गेले याचे मधु कुरुंदकर हे जवळचे साक्षीदार होते. त्यामुळे नरहर कुरुंदकरांना समजून घेण्यासाठी मधु कुरुंदकरांच्या या आठवणी फार मोलाच्या आहेत. मराठवाड्यात वसमत जवळचे कुरुंदे हे दोघांचेही मूळ गाव. उन्हाळ्याच्या सुट्टीत दोघा मित्रांच्या भेटी होत. दोघेही समवयस्क होते. इतर समवयस्क मित्रांच्या संगतीत खेळ व गप्पांना उधाण येई. लहानपणापासूनच नरहरीला वक्तृत्वाचे व अभ्यासाचे देणे लाभले होते. अनेकविध विषयांवर नरहरी चे मजेदार मूलगामी प्रगल्भ विवेचन (किंबहुना रसाळ निरुपण) सतत सुरू असे. ते ऐकताना समवयस्क मित्रच नव्हे तर गावातले वडीलधारे सुद्धा गुंग होऊन जात. पुढे मधु कुरुंदकर मॅट्रिकची परीक्षा नापास झाले त्यावेळी नरहर कुरुंदकर हेही मॅट्रिकची परीक्षा नापास झाले होते. नरहर कुरुंदकर हैदराबादला आपले मामा डॉक्टर नारायणराव नांदापूरकर यांच्याकडे शिकायला होते. त्यांनी आग्रह करून आपल्याबरोबर मधु कुरुंदकरांनाही हैदराबादला शिकायला नेले व इथूनच दोघांचे अगदी घनिष्ठ साहचर्य सुरू झाले.

हैदराबादला सिटी कॉलेजमध्ये शिकत असताना नरहरीचे चौफेर वाचन व व्यासंग सुरू होता. अभ्यासाकडे त्याचे फारसे लक्ष नसे. सतत व्यासंग, विद्वानांचा संग व त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा यातून नरहर कुरुंदकरांमधला विद्वान घडत गेला. अगदी लहान वयापासूनच नरहर कुरुंदकर किती अफाट वाचन आणि व्यासंग करीत व मोठमोठ्या विद्वानांना सुद्धा कसे प्रभावित व चकित करीत याचे अनेक किस्से मधु कुरुंदकरांनी या पुस्तकात सांगितले आहेत. मुळातच कुशाग्र असलेल्या नरहर कुरुंदकरांच्या बुद्धीला पैलू पाडण्याचे व त्यांच्या व्यासंगाला दिशा देण्याचे काम कुरुंदकर यांचे मामा डॉक्टर नांदापूरकर तसेच मराठीतले नामांकित विद्वान प्राध्यापक भालचंद्र महाराज कहाळेकर यांनी केले. हैदराबादच्या सिटी कॉलेजचे ग्रंथालय, आंध्र स्टेट लायब्ररी यासारख्या ग्रंथालयात मधल्या तसेच आपल्या मामांच्या ग्रंथसंग्रहातल्या मोठमोठ्या भक्कम ग्रंथांचा अगदी कमी वयात नरहर कुरुंदकरांनी फडशा पाडला होता. इंटरच्या वर्गापासून मात्र दोघा मित्रांचे मार्ग वेगळे झाले. मधु कुरुंदकर हे औरंगाबादला शिकायला गेले तर नरहर कुरुंदकर हैदराबादलाच शिकत राहिले. इथून दोघा मित्रांमध्ये काहीसा औपचारिक दुरावा आला, पण अंतरीची ओल मात्र कायम राहिली. पुढे नोकरीच्या निमित्ताने मधु कुरंदकर नांदेडला आले व एका खाजगी शाळेत शिक्षकाची तात्पुरती नोकरी करू लागले. त्यांनी ही नोकरी सोडल्यावर याच जागेवर नरहर कुरुंदकर यांची नेमणूक झाली. अशाप्रकारे दोघा मित्रांनी नांदेड येथेच आपापले संसार थाटले. नरहर कुरुंदकर पुढे पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक व नंतर प्राचार्य झाले आणि महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षितिजावर तेजाने तळपू लागले. तरीही आपल्या मैत्रीला ते ससतत जागले. पूर्वीइतकी सलगी आता शक्य नसली तरी दोघे मित्र एकमेकांना प्रेम व आधार देत असत.

वक्ते व विद्वान म्हणून नरहर कुरुंदकर यांची ख्याती कशी पसरत गेली यासंबंधी अनेक रम्य आठवणी मधु कुरुंदकर यांनी सांगितल्या आहेत. त्याचप्रमाणे एक तत्वनिष्ठ विचारवंत तसेच विद्यार्थीप्रिय व कर्तव्यदक्ष प्राध्यापक व प्राचार्य म्हणून नरहर कुरुंदकरांचे आचरण किती काटेकोर असे यासंबंधीही अनेक आठवणी यात आहेत. नरहर कुरुंदकरांच्या कर्तबगारीचा आलेख असा चढत जात असतानाच वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी व्यासपीठावरच औरंगाबाद येथे हृदयविकाराच्या आकस्मिक झटक्याने त्यांचे निधन झाले. आपल्या मित्राच्या निधनाचे मधु कुरुंदकरांनी केलेले वर्णन अतिशय चटका लावणारे आहे. ते वाचताना आपल्यालाही गहिवरून येते.

पुस्तकाच्या शेवटी परिशिष्टात नरहर कुरुंदकर यांच्या काही स्फुट आठवणी सुद्धा लेखकाने दिल्या आहेत. मधु कुरुंदकर हे स्वतः कवी व ललित लेखक होते किंबहुना छापून येणारे पहिले कुरुंदकर तेच. त्यांची भाषा ओघवती आहे. आपल्या मित्रा बद्दलचा भावनिक ओलावा त्यांच्या लिखाणात पदोपदी जाणवतो. त्याच्या आठवणींनी मिळणाऱ्या स्मरणसौख्यात आपल्यालाही सहभागी करून घेण्यात लेखक यशस्वी झाला आहे. या ग्रंथाच्या पुन: प्रकाशनाच्या निमित्ताने नरहर कुरुंदकर नावाच्या थोर प्रज्ञावंतांचे पुण्यस्मरण महाराष्ट्राला घडेल व कुरुंदकरांच्या विचारधनाचा परिशीलनाला नव्याने चालना मिळेल यात शंका नाही.

संगत नरहरची  – मधु कुरुंदकर , साधना प्रकाशन, पुणे  (मूल्य २०० रुपये. )

‘पुनश्च’ हरि: ॐ

मराठी माणूस जात्याच वाचनप्रेमी आहे असं मला सतत वाटत आलं आहे. तो वाचनाच्या बाबतीत अतिशय चोखंदळ आहे. वाचायची सवय आजकाल कमी झालेली आहे व त्यातल्या त्यात मराठी साहित्याला तर फार वाईट दिवस आले आहेत ही सार्वकालिक खंत आजही (कदाचित आधीपेक्षा थोड्या अधिक तीव्रतेने) व्यक्त होत असते. पण आजही चांगलं काही वाचायला मिळालं की त्यावर वाचकांच्या उड्या पडतात. मराठी साहित्याला उत्तमोत्तम साहित्यिक नियतकालिकांची एक वैभवशाली परंपरा राहिली आहे. साठ व सत्तर च्या दशकात तर सत्यकथा, मौज, किर्लोस्कर, माणूस, ललित यांसारख्या एकाहून एक सरस नियतकालिकांत त्यावेळचे नामवंत तसेच नव्या दमाचे प्रतिभावंत लिहीत होते. वाचकांना सकस ललित व वैचारिक साहित्याची मेजवानी मिळत होती. वाद झडत होते. आज मात्र यांतील बहुतेक गाजलेली नियतकालिके बंद झाली आहेत. काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. नुकतीच झालेली ‘अंतर्नाद’ ची एग्झिट मनाला चटका लावून गेली.

आज तिशीत असलेल्या माझ्या पिढीने मराठी नियतकालीकांचा हा सुवर्णकाळ पहिला/अनुभवला नाही. त्यामुळे या नियतकालीकांतील साहित्य व विचारधन यांपासून आम्ही वंचित राहिलो होतो. पण ही उणीव नेमकी हेरून ती भरून काढण्याचे काम ‘पुनश्च’ ने केले. न मागताच मराठी रसिकांना मिळालेली ही एक अभूतपूर्व देणगी आहे. कुठल्यातरी मंगल क्षणी श्री किरण भिडे यांना जुन्या-नव्या मराठी नियतकालिकांतील साहित्य व विचारधन मोबाईल अॅप च्या माध्यमातून अत्यंत नाममात्र दरांत मराठी रसिकांपुढे ठेवण्याची अभिनव कल्पना सुचली आणि त्यांनी लगेच ती प्रत्यक्षातही उतरविली. एक दिवस लोकसता मध्ये पुनश्च वरचा लेख वाचला आणि हरखून गेलो. ठरवलं की पुनश्च चा सभासद व्हायचंच आणि लगेच झालोही. गुढीपाडवा २०१७ पासून दर बुधवार-शनिवारी लेख यायला सुरुवात झाली. पु. लं., प्रा. पु. ग. सहस्रबुद्धे, आचार्य अत्रे, गौरी देशपांडे यांसारख्या दिग्गजांचे, तर काही टोपणनावाने लिहिलेले, जुन्या दर्जेदार मासिकांमधले लेख वाचायला मिळू लागले. अवांतर आणि नि:शुल्क सदरांत समकालीन विषयांवरचे स्फुट लेखही वाचायला मिळू लागले.

पुनश्च ने भीमा-कोरेगाव वादाच्या वेळी महाराष्ट्र पेटलेला असतांना व सोशल मीडियावर उठवळ लिखाणाचा पूर आलेला असताना आपल्या वाचकांसमोर ‘इंग्रजांचं भीमा-कोरेगांव’, ही अभ्यासपूर्ण व सप्रमाण तथ्य मांडणारी लेखमाला प्रसिद्ध केली. माझ्या मते हे गेल्या वर्षभराच्या वाटचालीतले पुनश्च चे सर्वात भरीव योगदान आहे. या वादावर इतके अभ्यासपूर्ण लेखन मलातरी कुठेच वाचायला मिळाले नाही.

यांसोबतच डॉ यश वेलणकर यांचे मेंदू व मनोव्यापार यांविषयीचे लेख व तंबी दुराई यांचे (दत्तू बांदेकरांची आठवण करून देणारे व गेल्या काही वर्षांत प्रचंड लोकप्रिय झालेले) राजकीय विडंबन ही पुनश्च ने केलेली दोन ‘व्हॅल्यू अॅडिशन्स’ आहेत.त्यांना दाद द्यावी तेवढी थोडी आहे. यापुढे इतिहासाचार्य राजवाडे, न. र. फाटक, दुर्गाबाई भागवत, सुनीताबाई देशपांडे, डॉ रा. चिं. ढेरे इत्यादी मान्यवरांचेही लेख वाचायला मिळतील अशी अपेक्षा आहे.

पुनश्च चा आतापर्यंतचा प्रवास सुंदर झाला आहे. पुढे तो आणखी सुंदर व्हावा. अधिक यशस्वी व्हावा. रसिकांना ही मेजवानी अशीच मिळत रहावी. महाराष्ट्राच्या वाचनप्रेमाचा ‘पुनश्च’ हरि: ॐ झाला आहे. या रोपट्याचा वेलू लवकरच गगनावरी जावा हीच सदिच्छा.

हवीहवीशी पुस्तके :विस्मृतीत गेलेल्या काही पुस्तकांबद्दल थोडेसे…

Image result for booksवाचनाचा आवाका जसाजसा वाढतो, तसातसा अनेक पुस्तकांसोबत परिचय होतो. काहींशी गाढ मैत्री होते, काही जुन्या नव्या पुस्तकांबद्दल माहिती मिळत जाते आणि वाचनानंद वर्धिष्णू होत जातो.

काही जुन्या पुस्तकांबद्दल माहिती मिळते, त्यांना वाचायची इच्छासुद्धा होते, पण अनेकदा ती पुस्तके दुर्मिळ झालेली असतात किंवा अनुपलब्ध असतात. अशा वेळी त्यांच्याबद्दल वाटणारी ओढ अधिकच वाढते. त्यांना काहीही करून मिळवायची इच्छा होते. मग मी वळतो इंटरनेट कडे. अनेकदा अशी पुस्तके कुठल्यातरी ऑनलाइन अभिलेखागारात अथवा गूगल बुक्स सारख्या संकेत स्थळावर ई-बुकच्या स्वरुपात आढळतात. कधीकधी जुनी पुस्तके विकणाऱ्या ऑनलाइन बुकस्टोअर मध्ये सापडतात तर कधी कुठल्या तरी ग्रंथालयात किंवा जुनी पुस्तके विकणारांकडे सापडतात. मात्र अनेकदा कुठेच सापडत नाहीत. हवे असलेले दुर्मिळ पुस्तक सापडल्यावर होणारा आनंद वेगळाच. मात्र अशा वेळी या पुस्तकाची आवृत्ती आज प्रकाशनात हवी होती असे वाटल्यावाचून राहत नाही.

आज मी अशाच काही मराठी व इंग्रजी पुस्तकांबद्दल लिहीणार आहे, जी आज फक्त ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहेत किंवा मुळीच उपलब्ध नाहीत, पण ज्ञानाच्या क्षेत्रात ज्यांचे मोल आहे आणि त्यांची आवृत्ती प्रकाशनात असणे माझ्या व माझ्यानंतरच्या पिढयांसाठी उपकारक आहे.

मी आयुष्यात वाचलेले पहिले गंभीर (व मोठे) पुस्तक म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवचरित कथनमाला. पाचव्या वर्गाची परीक्षा पास झाल्यानंतर बाबांचे कपाट धुंडाळतांना हे पुस्तक अवचित हाती लागले अन मग त्याने मनाचा ताबा कधी घेतला हे काही कळलेच नाही. पत्रकार गजानन खोले यांनी संकलित केलेले बाबासाहेबांच्या शिवचरित्रावरील व्याख्यानांचे हे पुस्तक पुण्याच्या इंद्रायणी साहित्य प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते. पुढे राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांनी लिहिलेले चरित्र वाचण्याचाही योग आला. पण कथनमालेत त्यामानाने अधिक तपशील होते व ते अधिक रंजकही होते. मला आठवते, कवी भूषणाचे पूर्वायुष्य, त्याचा त्याच्या वहिनीशी स्वयंपाकातील मिठावरून झालेला वाद व पुढे भूषणाच्या प्रसिद्धी मिळविण्याची कथा- या सगळ्या व अशांसारख्या अनेक रंजक तपशीलांनी शिवचरित कथनमाला भरलेली आहे. आज हे पुस्तक माझ्याजवळ नाही. खूप धुंडाळले. इंटरनेट वर शोधले. प्रकाशकांकडेही चौकशी केली, पण गेली अनेक वर्षे हे पुस्तक आवृत्तीत नसल्यांचे कळते. आता काही ग्रंथालयात त्याचा जुन्या प्रती शिल्लक आहेत, तेवढ्याच.

हे पुस्तक प्रकाशनात असावे असे प्रकर्षाने वाटते. यावर वाचकांच्या उड्या पडतील हे मात्र निश्चित. इंद्रायणी साहित्त्य प्रकाशनानेच हे कार्य शक्य तितक्या लवकर करावे असे विनम्रपणे सुचवावेसे वाटते.

१८५७ ची शिपाई गर्दी हे आज प्रा. नरहर रघुनाथ फाटक यांचे पुस्तकही अत्यंत दुर्मिळ झालेल्या पुस्तकांच्या श्रेणीत येते. १९५७ साली १८५७ च्या उठावाला शंभर वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची वेगळी मीमांसा करणारे प्रा. फाटकांचे हे पुस्तक आहे. १८५७ चा उठाव हा स्वातंत्र्यसमर नसून केवळ शिपाईगर्दी होती असे या पुस्तकातील फाटकांचे मत अत्यंत वादग्रस्त ठरले. कठोर वैचारिक शिस्तीचा, भरपूर पुराव्यांनिशी विषयांची मांडणी करणारा नामूलं लिख्यते किंचित हे व्रत कसोशीने पाळणारा अभ्यासक म्हणून प्रा. फाटक प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या पुस्तकाने महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली. आचार्य अत्र्यांनी तर फाटकांविरुद्ध आघाडीच उघडली. चित्रशाळा प्रेसने १९५७ साली प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची प्रत मलातरी आज कुठेही आढळली नाही. ई-बुक स्वरुपात तर राहोच पण मी DELNET, Digital Library of India अशा ग्रंथालयाच्या जालांमध्येही शोध घेतला. पण कुठल्या ग्रंथालयामध्येही हे पुस्तक आढळले नाही.

मला या पुस्तकाबद्दल प्रचंड कुतूहल आहे. फाटकांनी आपल्या मताच्या समर्थनार्थ काय पुरावे दिले असतील व कसा युक्तिवाद केला असेल हे जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. २००७ साली १८५७ च्या उठावाला दीडशे वर्षे पूर्ण झाली. त्या वेळी सुद्धा या पुस्तकाची आवृत्ती निघाली नाही. आतातरी कुठल्यातरी प्रकाशकाने या पुस्तकाची आवृत्ती काढून एक महत्वपूर्ण पुस्तक विस्मृतीत जाण्यापासून वाचवावे. फटकांशी स्नेहबंध असलेले मुंबई मराठी साहित्य संघ हे करेल काय ?

सेतुमाधवराव पगडी यांचे इतिहास आणि कल्पित हे असेच एक दुर्मिळ झालेले अप्रतिम पुस्तक. ललित साहित्यातून अनेकदा चुकीचा इतिहास मांडला जातो. साहित्यिक कधी कधी अवाजवी स्वातंत्र्य घेतात. सेतुमाधवरावांनी आपल्या नर्म विनोदी, खुसखुशीत शैलीत अनेक ललित साहित्यकृतींचा परामर्श घेऊन खरा इतिहास कथन करीत सामान्य वाचकांच्या ज्ञानात भर घातली आहे. ललित साहित्यात संभाजी महाराजांवर झालेला अन्याय, राणी पद्मिनीची कहाणी व त्या मागचे सत्य, घाशीराम कोतवाल प्रकरण या व अशांसारख्या अनेक बाबींवर सप्रमाण असा प्रकाश पगडींनी टाकला आहे. या शिवाय इतिहास संशोधन करतांना आलेले मजेदार अनुभव तसेच इतरही काही मनोरंजक स्फुट लेख या संग्रहात आहेत. माझ्या वडिलांच्या महाविद्यालयातील ग्रंथालयातून आणलेले हे पुस्तक मी दोनदा वाचले आहे. शेवटचे २००४ साली वाचले. त्याची अवीट गोडी अजून स्मरते. आज हे पुस्तक प्रकाशनात नाही. अलिकडे हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेने प्रकाशित केलेल्या समग्र सेतुमाधवराव पगडी च्या खंडांमध्ये हे पुस्तक आहे. पण त्याची स्वतंत्र आवृत्ती निघणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे.

Continue reading