रेप ऑफ ल्युक्रीस आणि व्हीनस अँड अॅडोनिस

रेप ऑफ ल्युक्रीस:

Buy The Rape of Lucrece Book Online at Amazon | The Rape of Lucrece Reviews  & Ratingsहे शेक्सपिअरने रचलेले एक दीर्घकाव्य आहे. या काव्याच्या कथेचे मूळ रोमन साम्राज्याच्या इतिहासात व तत्कालीन रोममध्ये प्रचलित असलेल्या दंतकथांमध्ये आहे. रोमचा राजपुत्र सेक्स्टस टारक्वीनियस त्याच्या मित्राची पत्नी ल्युक्रीस हिच्यावर बलात्कार करतो. काव्याच्या सुरुवातीला टारक्वीनियसची ल्युक्रीससाठी असलेली अभिलाषा व टारक्वीनियसद्वारे ल्युक्रीसचा बलात्कार यांचे वर्णन आहे. यानंतर टारक्वीनियसला केलेल्या कृत्याबद्दल भयंकर विषाद वाटायला लागतो. यापुढे कवितेचा रोख मुख्यतः ल्युक्रीसला वाटत असलेली अतीव लज्जेची भावना यांच्याकडे वळतो. या काव्यात शेक्सपीयरने मुख्यतः नाट्यछटा किंवा ड्रामॅटिक मोनोलॉग या काव्यप्रकाराचा वापर केला आहे. प्रथम टारक्वीनियस स्वतःच्या मनात ल्युक्रीसबद्दल असलेली अभिलाषा व्यक्त करतो व सोबतच ल्युक्रीस ही त्याच्या मित्राची पत्नी असल्याने तिच्यावर बळजबरी करणे म्हणजे मित्रद्रोह होईल व त्यामुळे आपल्या व आपल्या परिवाराच्या कीर्तीला कायमचा बट्टा लागेल असेही तो म्हणतो. ल्युक्रीस आपल्यावर झालेल्या बलात्कारामुळे तिला वाटत असलेली लज्जा व भयंकर वैषम्य व्यक्त करते व शेवटी आत्महत्येचा निर्णय घेते. ल्युक्रीसला आत्महत्या करताना दाखवलेले अनेक समीक्षकांना आवडलेले नाही. कारण रोमन संस्कृतीत अपमानाच्या वैषम्यातून आत्महत्या करणे स्वाभिमानाचे प्रतीक मानले जात असे. याउलट ख्रिश्चन धर्मात मात्र आत्महत्येला महापाप समजले जाते.

व्हीनस अँड अॅडोनिस:

Venus and Adonis१५९० च्या सुमारास लिहीलेले व्हीनस अँड अॅडोनिस हे काव्य म्हणजे शेक्सपिअरची पहिलीवहिली काव्य रचना आहे. हे काव्य महाकाव्याच्या स्वरूपात लिहिलेले असले तरी महाकाव्यापेक्षा बरेच लहान असे एक दीर्घकाव्य आहे. सोळाव्या शतकाच्या अखेरीस अनेक नवोदित कवी या प्रकारची काव्ये लिहित असत. ओव्हिड या रोमन कवीने लॅटिन भाषेत लिहिलेल्या मेटामॉर्फॉसिस या महाकाव्यापासून प्रेरणा घेऊन शेक्सपिअरने हे काव्य रचले. व्हीनस ही रोमन संस्कृतीतील सौंदर्य व प्रेमाची देवता पृथ्वीवरच्या ॲडोनीस या हँडसम शिकारी तरुणाच्या प्रेमात पडते. (ओव्हिड ने त्याच्या मूळ काव्यात ॲडोनीस हा व्हीनसच्या प्रेमात पडतो व तिची प्रेम आराधना करतो दाखविले आहे.) मात्र शेक्सपिअरच्या ॲडोनीसला प्रेमाबिमात फारसा रस नाही. तो उलट व्हीनसच्या प्रेमाचा अव्हेर करतो बीडच्या काव्यातील ॲडोनीस अपघाताने मृत्यू पावतो साक्षात प्रेमाची देवता स्वर्ग सुंदरी वीनस ॲडोनीस सारख्या मृत्यू लोकांच्या तरुणाच्या प्रेमात पडलेली आहे असे असूनही शेक्सपिअरच्या ॲडोनीस मात्र विनच्या प्रेम याच यांचा सतत अव्हेर करतो शिकारीसाठी जंगलात गेलेल्या ॲडोनीस ला पाहताच व्हीनस त्याच्यावर मोहित होते व त्याच्याकडे प्रेमाची याचना करते ते मात्र ॲडोनीस तिला नकार देतो व त्यामुळे ती बेशुद्ध पडते प्रेम अभंगामुळे तिचा मृत्यू तर झाला नाही ना असे वाटून ॲडोनीस तिला कुरवाळतो व ती जागी होऊन पुन्हा ॲडोनीस कडे प्रेम याचे ना करते मात्र ॲडोनीस पुन्हा नकार देत आपण उद्या जंगली अस्वलाच्या शिकारीसाठी जाणार असल्याचे सांगतो ही शिकार करताना ॲडोनीस ला मृत्यू येणार आहे हे वीनस आपल्या दैवी शक्तीने जाणून घेते व त्याच्या शिकारीच्या बेटापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते तिचे ना एकदा ठरल्याप्रमाणे शिकारीला जातो व जंगली अस्वल आखडून मारला जातो वीनस ला आपल्या प्रियकराच्या मृत्यूचे अपार दुःख होते जमिनीवर सांडलेल्या डॉनच्या रक्ताच्या थेंबापासून वायलेट ची फुले उगवतात दुखी अंतकरणाने प्रेम अभंगामुळे कष्टी झालेली वीनस पुन्हा देवलोकात परतते खरे प्रेम म्हणजे काय याचा शोध घेत असलेल्या तरुण शेक्सपिअरचे दर्शन हे काव्य आपल्याला घडवत ते अत्यंत उत्कट व लालित्यपूर्ण असे हे काव्य शेक्सपियरच्या संपूर्ण जीवन काळात अतिशय लोकप्रिय झाले होते

शेक्सपिअर

Shakespeare 1शेक्सपिअर च्या जन्माची नक्की तारीख माहित नाही. परंतु त्याचा जन्म २३ एप्रिल १५६४ रोजी झाला असे बहुतेक अभ्यासक मानतात. याचे कारण म्हणजे शेक्सपिअरच्या जन्माची नोंद उपलब्ध नसली, तरी त्याला बाप्तिस्मा दिल्याची, म्हणजेच ख्रिश्चन धर्मानुसार त्याचे नामकरण करून त्याला ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिल्याची नक्की नोंद उपलब्ध आहे. इंग्लंडच्या वॉरविकशायर परगण्यातील अॅव्हॉन नदीकाठी वसलेल्या स्ट्रॅटफर्ड या गावात (Stratford-upon-Avon) या गावात शेक्सपिअरचा जन्म झाला. गावातल्या चर्चच्या दस्तऐवजात २६ एप्रिल १५६४ रोजी जॉन शेक्सपिअरचा मुलगा विलियम याचे नामकरण केल्याची नोंद आहे. त्याकाळी बाळाच्या जन्मानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी बाप्तिस्मा देत असत. त्यावरून २६ एप्रिल १५६४ हीच विलियम शेक्सपिअर ची जन्मतारीख असावी असा जवळजवळ निश्चित अनुमान अभ्यासकांनी बांधला आहे. विलियमचे वडील जॉन शेक्सपिअर यांचा स्ट्रॅटफर्ड गावात चामड्याचे हातमोजे बनवून विकण्याचा धंदा होता. व्यवसायात बर्‍यापैकी जम बसल्यावर जॉनने चामड्याच्या इतर वस्तू विकण्याचाही धंदा सुरू केला व त्यात चांगली प्रगती केली. पुढे त्याने मेरी आर्डेन या मुलीशी लग्न केले व घरही बांधले. याच घरात विलियमचा जन्म झाला. जॉन व मेरी शेक्सपिअरच्या एकूण आठ अपत्यांपैकी विलियम हे तिसरे अपत्य आणि जगलेला सर्वात मोठा मुलगा होय. कालांतराने जॉनला समाजात बराच मानसन्मान मिळाला. त्याला आधी स्ट्रॅटफर्डच्या नगरपालिकेचा सदस्य व नंतर अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. छोटा विलियम त्यावेळच्या प्रथेनुसार सातव्या-आठव्या वर्षी गावच्या सरकारी शाळेत (त्याला किंग्ज ग्रामर स्कूल असं म्हणत) जाऊ लागला. तिथे त्याला गुरुजींकडून छडी लागे छम छम च्या पद्धतीने लॅटिन भाषा व व्याकरण यांचे शिक्षण मिळत असे. त्याकाळी ग्रीक व लॅटिन या अभिजात भाषाच शाळेत शिकविल्या जात असत. त्या शिकणे हे केवळ प्रतिष्ठेचेच लक्षण मानले जात असे नव्हे, तर सरकारी नोकरीसाठी ही ते आवश्यक मानले जाई. मुख्य भर व्याकरणावर व पाठांतरावर असे. छडीचा वापर मुक्तपणे होत असे. लहानग्या विलियमला या रुक्ष व नीरस शिक्षणाचा कंटाळा येत असे. ‘सेवन एजेस ऑफ मॅन’ या आपल्या कवितेत शेक्सपिअरने माणसाच्या बालपणाचे जे चित्र रेखाटले आहे ते कुरकुरत, अनिच्छेने शाळेत जाणाऱ्या बालकाचे आहे. ही प्रतिमा त्याच्या स्वतःच्या बालपणाच्या अनुभवांवरूनच बेतली आहे. शाळेत जरी विलियमचे मन लागत नसले तरी स्ट्रॅटफर्डच्या निसर्गरम्य परिसरात मनसोक्त भटकणे, उनाडक्या करत फिरणे आणि गावात येणारे तमाशे, खेळ, जत्रा, नाटके बारकाईने पाहत त्यांचा आनंद लुटणे, हे त्याला खूप आवडत असे. लहानपणाच्या या निरीक्षणातून जमवलेल्या शिदोरीच्या आधारेच पुढे शेक्सपिअरने आपली जगविख्यात नाटके रंगविली. उत्तम निरीक्षण व चौकस बुद्धी यांच्या जोडीला शेक्सपिअरचे वाचनही उत्तम होते हे त्याच्या नाटकांच्या कथानकांतल्या विविधतेवरून व त्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या विपुल संदर्भांवरून सहज लक्षात येते. इंग्रज इतिहासकार रॅफेल हॉलिनशेड याने लिहिलेला इंग्लंडचा इतिहास, रोमन इतिहासाचे ग्रंथ, इटालियन लोककथा त्याच प्रमाणे होमर, डाण्ट‍े, पेट्रार्क, बोकेशियो यांसारखे अभिजात कवी व नाटककार शेक्सपिअरने वाचले होते हे त्याच्या नाटकांवरून व त्याच्या काव्यावरून स्पष्ट होते.

अठरा वर्षांचा असताना तरुण विलियम आपल्यापेक्षा वयाने आठ वर्षांनी मोठ्या असलेल्या अॅन हॅथवे नावाच्या स्त्रीच्या प्रेमात पडला. दोघांनी रीतसर लग्न केले, पण लग्नाच्या आधीपासूनच अॅन विलियमपासून गरोदर राहिली. होती लग्नाच्या सहा महिन्यानंतर त्या जोडप्याला एक मुलगी झाली तिचे नाव सुझाना असे ठेवण्यात आले. पुढे तीन वर्षानंतर अॅन व विलियम यांना हॅम्नेट नावाचा मुलगा व जूडिथ नावाची मुलगी अशी जुळी अपत्ये झाली. दुर्दैवाने हॅम्नेट वयाच्या अकराव्या वर्षीच मरण पावला. मोठी सुझाना सहासष्ट वर्षे आणि जूडिथ सत्याहत्तर वर्षे जगली. इ. स. १५८५ च्या सुमारास त्यावेळी विशीत असलेला शेक्सपिअर नशीब आजमावण्यासाठी स्ट्रॅटफर्ड सोडून लंडनला आला. तिथे सटरफटर कामे करून त्याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. पण तो नक्की कोणत्या वर्षी लंडनला आला व त्याने तिथे नेमकी काय कामे करून आपली कारकीर्द सुरू केली याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे शेक्सपिअरच्या चरित्रकारांनी यासंबंधी केवळ तर्कच बांधले आहेत. अनेक अभ्यासकांच्या मते शेक्सपिअरने लंडनच्या नाट्यगृहाच्या बाहेर नाटक पाहायला येणाऱ्या सरदार व उमराव यांचे घोडे सांभाळण्याच्या कामापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली व लवकरच त्याला लॉर्ड चेंबरलेन्स मेन या प्रसिद्ध नाटक कंपनीत लहान-सहान भूमिका करण्याची संधी मिळाली. अभिनयाबरोबरच शेक्सपिअरने याच कंपनीसाठी नाटकेही लिहायला सुरुवात केली. १५९२ च्या सुमारास शेक्सपिअरची नाटके लंडनच्या रंगमंचावर येऊ लागली होती. Henry VI (भाग १, २ व ३) , Titus Andronicus, The Two Gentlemen of Verona ही रंगमंचावर आलेली शेक्सपिअर ची सुरुवातीची काही नाटके. अल्पावधीतच या नाटकांना उत्तम लोकप्रियता लाभली.

[इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे- त्याकाळी नाटके ही केवळ करण्याची व पाहण्याची बाब होती. वाचण्यासाठी नाटकांची पुस्तके छापली जात नसत. हे होण्यासाठी बराच काळ जावा लागला. ] कानामागून येऊन तिखट झालेल्या या तरुण नाटककाराला त्या वेळच्या काही प्रस्थापित नाटककारांनी सुरुवातीला नाके मुरडली. रॉबर्ट ग्रीन या प्रस्थापित नाटककाराने शेक्सपीयरला आपल्या एका नाटकातून ‘an upstart crow’ (एक आगंतुक कावळा) असा टोमणा मारला होता. मात्र त्याचवेळी बेन जॉन्सन सारखे इतर काही समकालीन नाटककार मात्र शेक्सपिअरची मुक्तकंठाने प्रशंसा करताना दिसतात. इ. स. १५८५ ते १५९२ या काळात शेक्सपिअरच्या आयुष्यात काय घडले यासंबंधी काहीच विश्वसनीय माहिती मिळत नाही. म्हणूनच या कालखंडाला शेक्सपिअरच्या आयुष्याची ‘हरवलेली वर्षे’ अर्थात लॉस्ट इयर्स असे म्हणतात. शेक्सपीयरने एकूण ३७ नाटके लिहिली. विषयवस्तूनुसार त्यांची ढोबळमानाने खालील प्रमाणे विभागणी करता येईल-

  • Tragedies (शोकांतिका)
  • Comedies (सुखात्मिका)
  • Tragicomedies (मिश्र नाटके)
  • English History Plays (इंग्लंडच्या इतिहासावर आधारित ऐतिहासिक नाटके)
  • Roman History Plays (रोमन इतिहासावर आधारित ऐतिहासिक नाटके)

यात हॅम्लेट, मॅकबेथ व ऑथेल्लो व किंग लियर या शेक्सपिअरच्या सगळ्यात प्रसिद्ध शोकांतिका आहेत. याशिवाय रोमिओ अँड ज्युलिएट ही सुद्धा शेक्सपिअरची प्रसिद्ध शोकांतिका आहे. त्याचप्रमाणे मर्चंट ऑफ व्हेनिस, अॅज यू लाईक इट, ट्वेल्फ्थ नाईट, कॉमेडी ऑफ एरर्स, ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल, ए मिडसमर नाईट्स ड्रीम इत्यादी त्याची काही प्रसिद्ध सुखांत नाटके (कॉमेडीज) आहेत. मेझर फॉर मेझर, विंटर्स टेल, द टेम्पेस्ट ही शेक्सपिअरची मिश्र नाटके आहेत. यांत सुख-दु:ख दोन्हींचे मिश्रण दिसून येते.

इंग्लंडच्या इतिहासावर आधारलेली तब्बल दहा नाटके शेक्सपिअरने लिहिली. यात King John, Richard II, King Henry IV Part 1, King Henry IV Part 2, King Henry V, King Henry VI (Part 1, 2, 3), Richar III, आणि Henry VIII या नाटकांचा समावेश होतो. ही नाटके देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत आहेत. इतकी, की या इंग्लंड हा देशच या नाटकांचा नायक आहे असे म्हटले जाते.

Antony and Cleopatra, Julius Caesar, Coriolanus आणि Titus Andronicus ही नाटके रोमन इतिहासातील व्यक्तिरेखांवर आधारित आहेत.

इंग्लंडच्या इतिहासावर आधारित नाटकांची कथानके शेक्सपीयरने मुख्यतः एडवर्ड हॉल व रॅफेल हॉलिनशेडच्या क्रॉनिकल्स या इतिहास ग्रंथातून घेतलेली आहेत, तर रोमन इतिहासावर आधारित नाटकांची कथानके मुख्यतः रोमन इतिहासकार प्लूटार्क याने लिहिलेल्या Lives of the Noble Grecians and Roman या रोम व ग्रीसच्या प्रसिद्ध व्यक्तींच्या चरित्रांच्या ग्रंथातून घेतलेली आहेत. सर थॉमस नॉर्थ याने प्लूटार्कच्या ग्रंथाचा केलेला इंग्रजी अनुवाद शेक्सपिअरने यासाठी वाचला होता.

१६११ साली लिहिलेले द टेम्पेस्ट हे शेक्सपिअरचे शेवटचे नाटक होते. टेम्पेस्ट सुद्धा संमिश्र नाटक आहे. यानंतर शेक्सपिअरने निवृत्ती पत्करली व आपले उर्वरित आयुष्य त्याने आपल्या गावी स्ट्रॅटफर्ड येथेच घालवले.

शेक्सपिअर चा मृत्यू २३ एप्रिल १६१६ रोजी स्ट्रॅटफर्ड येथे झाला. शेक्सपिअरच्या जन्माच्या तारखेची नक्की नोंद नसली तरी त्याच्या मृत्यूची मात्र स्पष्ट व अधिकृत नोंद आहे, मात्र त्याचा मृत्यू नक्की कशाने झाला हे अज्ञात आहे. कदाचित एखाद्या साथीच्या रोगाने तो मरण पावला असावा असा तर्क आहे. परंतु मृत्यूपूर्वी काही वर्षे आधीपासूनच सततच्या दगदगीमुळे शेक्सपिअरची प्रकृती खालावत होती असाही अनुमान त्याच्या लिखाणावरून काही अभ्यासक काढतात.

शेक्सपिअरच्या नाटकांचे वैशिष्ट्य

शेक्सपिअरच्या नाटकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची कथानके विविध प्रचलित काव्ये, लोककथा किंवा इतिहास यांवर बेतलेली आहेत आणि तरीही ही नाटके मूळ कथानकांची हुबेहूब नाट्य रूपांतरणे नाहीत. शेक्सपिअरने आपल्या प्रतिभेचा वापर करून त्यांत अनेक बदल केले व मूळ कथानकाची नाट्यमयता त्यामुळे अधिकच वाढली. यामुळे शेक्सपिअरच्या नाटकांत जिवंतपणा आला व त्यातील संघर्ष अधिक रंगतदार झाला. म्हणूनच शेक्सपिअरची नाटके नाट्यवेड्या इंग्रज प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. शेक्सपिअर त्याच्या काळातला सर्वोत्कृष्ट नाटककार तर होताच पण त्याचबरोबरच तो उत्कृष्ट नटही होता.

नाटकांशिवाय शेक्सपिअरने विपुल व उत्कृष्ट काव्यरचनाही केली आहे. त्याच्या काव्यसंपदेत Rape of Lucrece, Venus and Adonais, Troilus and Criseyde ही दोन दीर्घकाव्ये १५४ सॉनेट्स (म्हणजेच सुनीते) यांचा समावेश होतो. सॉनेट हा मूळचा इटालियन काव्यप्रकार. इटालियन कवी पेट्रार्क याने तो इटालियन साहित्यात नावारूपाला आणला. सॉनेट म्हणजे 14 ओळींची कविता. या चौदा ओळींत पहिले कडवे आठ ओळींचे आणि दुसरे कडवे सहा ओळींचे – अशी दोन कडवी असतात. वॅट आणि सरे या दोन इंग्रज कवींनी हा प्रकार इंग्रजी साहित्यात रूढ केला. मात्र सॉनेटला खरी लोकप्रियता मिळवून दिली ती शेक्सपिअरने. त्याने सॉनेटच्या स्वरूपात बदल करून चार-चार ओळींची तीन कडवी आणि दोन ओळींचे एक शेवटचे कडवे असे नवे स्वरूप रूढ केले. अशाप्रकारे पेट्रार्कन सॉनेट (८+६ ओळी) व शेक्सपिरीअन सॉनेट (४ + ४ + ४ + २ ओळी) असे सॉनेटचे दोन प्रकार इंग्रजी साहित्यात रूढ झाले. शेक्सपिअरच्या १५४ सॉनेट्स पैकी १२६ सॉनेट्स त्याने आपल्या एका तरुण मित्राला उद्देशून लिहिल्या आहेत तर २८ सॉनेट्स एका अज्ञात स्त्रीला (जिचा उल्लेख तो डार्क लेडी असा करतो) उद्देशून लिहिल्या आहेत. हा मित्र नक्की कोण होता तसेच ही डार्क लेडीसुद्धा कोण होती, यासंबंधी अजूनही स्पष्ट पुराव्यांच्या अभावी नक्की माहिती मिळत नाही. मात्र विविध प्रकारे संशोधन करून अभ्यासकांनी काही महत्वाचे निष्कर्ष काढले आहेत. अनेकांचा असा कयास आहे की हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून शेक्सपिअरचा आश्रयदाता असलेला अर्ल ऑफ साउथॅम्प्टन हेन्री रियोथेस्ले (Henry Wriothesley) हा होता. काहींच्या मते या तरुण मित्राप्रति शेक्सपिअरचे आकर्षण समलैंगिकतेकडे झुकताना दिसते. पहिल्या १७ सॉनेट्समध्ये शेक्सपिअर आपल्या मित्राला लग्न करून वंशविस्तार करण्याचा सल्ला देतो तर पुढच्या १०९ सॉनेट्समध्ये तो आपल्या या तरूण मित्राप्रती आपले प्रेम व्यक्त करून आपल्या कविता या मित्राचे सौंदर्य अजरामर करतील अशी त्याला ग्वाही देतो.

नंतरच्या २८ सॉनेट्स रहस्यमयी डार्क लेडी ला उद्देशून लिहिलेल्या आहेत. ही डार्क लेडी कोण असावी व शेक्सपिअरच्या आयुष्यात तिचे काय स्थान होते यासंबंधीचे गूढ अधिकच गहिरे आहे. या व्यक्ती कोणी का असेनात, मात्र साहित्यिकदृष्ट्या या सॉनेट्सचे मूल्य वादातीत आहे. या सॉनेट्समध्ये शेक्सपिअरच्या भावनांचा अत्यंत उत्कट आविष्कार पाहायला मिळतो. शारीरिक ओढ, अशरीरी प्रेम, मानवी जीवनाची क्षणभंगुरता, प्रेमभंग, आशा-निराशा यांचा माणसाच्या जीवना ऊन-सावलीसारखा चाललेला खेळ, असे अनेक विषय या सॉनेट्स मधून शेक्सपीयरने हाताळले आहेत. या सॉनेट्समधले उपमा सौंदर्यही बेजोड आहे. अनेक ठिकाणी शेक्सपिअरने आपली मते अत्यंत सूचकपणे व्यक्त केली आहेत. त्याच्या स्वतःच्या आयुष्याचे प्रतिबिंबही या सॉनेट्स मध्ये बऱ्याच ठिकाणी उमटले असावे असे मानायला भरपूर वाव आहे. या लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नाखुषीने शाळेत जाणाऱ्या लहान मुलाचा एका सॉनेटमधील उल्लेख हा शेक्सपिअरचा बालपणाचा स्वानुभव असावा याबाबत जवळजवळ एक मत आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. ती म्हणजे या सॉनेट्सना शेक्सपिअरने स्वतः शीर्षके दिली नाहीत. त्यामुळे अभ्यासकांनी सोयीसाठी त्यांना क्रमांक दिले आहेत. क्वचित काहीवेळा पाठ्यपुस्तकांसाठी सोय म्हणून त्या सॉनेटच्या पहिल्या ओळीलाच शीर्षक म्हणून वापरण्यात येते.

शेक्सपिअरकालीन इंग्रजी रंगभूमी

शेक्सपिअरच्या काळातील इंग्रजी रंगभूमी कशी होती या संबंधी थोडे जाणून घेऊया. शेक्सपिअरच्या काळातील नाट्यगृह हे गोलाकार असे. मध्यभागी रंगमंच व त्याच्या चारी बाजूंनी प्रेक्षकांना बसण्यासाठी लाकडी पायऱ्यांची उतरंड असे. त्या काळात वीज किंवा इतर तत्सम प्रकाशव्यवस्था अर्थातच नव्हती. त्यामुळे नाटके दिवसा सादर केली जात. साधारणतः दुपारी दोन वाजता नाटक सुरू होत असे. एखाद्या नाटकात रात्रीचा सीन असेल किंवा चंद्र तार्‍यांची वर्णने असतील, तर प्रेक्षकांना केवळ अभिनेत्यांच्या संवादांवरूनच त्यांची कल्पना करावी लागत असे. बसण्याच्या व्यवस्थेनुसार प्रेक्षकांसाठी तिकिटांचे दर असत. रंगमंचावर उभे राहून नाटक बघण्यासाठी सर्वात कमी, म्हणजे एक पेनी इतके तिकीट असे. बसून नाटक पाहायचे असल्यास दोन पेन्स द्यावे लागत. गादी लावलेल्या खुर्चीवर बसून नाटक पाहण्यासाठी तीन पेंन्सचे तिकीट असे. (ज्या काळी एका दिवसाच्या मजुरीचा दर बारा पेन्स होता त्यावेळचे हे नाटकाच्या तिकिटाचे दर आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे). नाट्यगृहात ठेवलेल्या एका विशिष्ट बॉक्समध्ये प्रेक्षक हे पैसे टाकत व नंतर हा बॉक्स एका वेगळ्या खोलीत सुरक्षित ठेवला जाई. तिकिटांच्या पैशांचा बॉक्स ठेवण्याची खोली म्हणून या खोलीला बॉक्स ऑफिस म्हणत. तेव्हापासूनच नाट्यजगतात व पुढे सिनेमासृष्टीत तिकिटांच्या गल्ल्यासाठी बॉक्स ऑफिस हा शब्द रूढ झाला.

यापुढील लेखांत आपण शेक्सपिअरच्या साहित्याचा क्रमश: परिचय करून घेऊ.

धन्य ते गायनी कळा… धन्य गानकोकिळा !

“If man’s fate is to suffer in an unfriendly universe, Beethoven’s music creates the spirit to endure and even to exult in the endurance.”

फार पूर्वी एका पुस्तकात संगीतकार बीथोवेनवरच्या एका चरित्रात्मक लेखातल्या या ओळी आज लतादीदींच्या महाप्रयाणाच्या निमित्ताने खूप प्रकर्षाने आठवल्या. सोसणं हेच जर माणसाचं प्राक्तन असेल तर बीथोवेनचं संगीत ते  सोसणं सुसह्य करतं, एवढंच नव्हे तर त्या सोसण्यातही आनंद निर्माण करतं. या बीथोवेनबाबतच्या ओळी लतादीदींच्या बाबतीतही अगदी सार्थ ठरतात. कोट्यावधी मनुष्यांची आयुष्यं फुलविणारा, कोट्यावधींचे जगणे सुसह्य करणारा, दैवी स्वर ज्या शरीरातून प्रकटायचा, ते शरीर निसर्गनियमानुसार आज पंचतत्वात विलीन झाले. दीनानाथ मंगेशकर नावाच्या या लोकोत्तर कलाकाराची ही कन्या आपल्या पित्याच्या कीर्तीलाही झाकोळत स्थिरचर व्यापून दशांगुळे उरली. ती जगापुढे आली  तेच मुळी शूरा मी वंदिले गात. कोल्हापूरच्या पॅलेस थिएटरच्या रंगमंचावर परकर-पोलक्यातली चारचौघा मुलींसारखी दिसणारी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची ही कन्या फार तर एखादे बडबडगीत गाऊन कौतुकाची टाळी घेईल अशी अपेक्षा करणारा श्रोतृवृंद विजेच्या लखलखाटासारखा शूरा मी वंदिले म्हणत समेचा भेद करणारा स्वर ऐकून जो एकदा स्तिमित झाला तो पुढे चार पिढ्या तसाच स्तिमित होत राहिला. जन्मतःच रवीबिंब गिळायला झेपावणाऱ्या हनुमंतासारखीच ही झेप होती. ही देवाघरची देणी असतात. त्याला लौकिक मोजमापाच्या फूटपट्ट्या चालतच नाहीत. दिपून जाणे एवढेच तिथे आपल्या हाती असते. हृष्यामि च पुनःपुनः असे म्हणणार्‍या संजयासारखे आपण पुन्हा पुन्हा हर्षभरित होत राहतो.

पण याचा अर्थ लतादीदींचे मोठेपण पण केवळ जन्मजात किंवा देवदत्त होते असा नाही. ते विक्रमार्जित सत्व होते. ती स्वयमेव मृगेंद्रता होती. तपश्‍चर्येशिवाय मोठेपण मिळत नसते. महाभारतात- मोठेपण कशाने मिळते? या यक्षाच्या प्रश्नाला उत्तर देताना युधिष्ठिर म्हणतो- तपसेन महता पदम्– म्हणजे तपश्चर्येने मोठेपण मिळते. लता मंगेशकरांना मोठेपण सहज मिळाले नाही. कष्टाचे डोंगर उपसत, व्रतस्थ जीवन जगत आणि स्वार्थ बाजूला ठेवून जे खडतर आयुष्य त्या जगल्या त्याची कल्पना फार फार थोड्या लोकांना असेल. आठ दशके, छत्तीस भाषांमधून विविध प्रकारची हजारो गाणी गायची- आणि ती सुद्धा दर्जाशी कुठलीही तडजोड न करता- हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. ज्या भाषेत गायचे, त्या भाषेच्या शब्दांचे उच्चार अचूक व सफाईदार आलेच पाहिजेत असा कटाक्ष ठेवून लतादीदी गायिल्या. म्हणून हिंदी-मराठी श्रोत्यांना त्या जितक्या आपल्या वाटतात, तितक्याच सिंहली किंवा तमिळ श्रोत्यांनाही आपल्याच वाटतात. हिंदी सिनेमासाठी गायचे तर उर्दू उच्चार अचूक हवेत म्हणून संगीतकार नौशाद यांच्या आग्रहाखातर त्या उर्दू शिकल्या. मुगले-आजम सारख्या अभिजात चित्रपटाची गाणी इतक्या अचूक उर्दू उच्चारांसह गाणारी ही गायिका मराठी भाषिक आहे हे अनोळखी माणसाला सांगूनही खरे वाटणार नाही.

एका इंग्रज प्राध्यापकाने एका जपानी विद्यार्थ्याला एकदा विचारले- “बाळा तुला शेक्सपियर का आवडतो?” त्यावर तो जपानी विद्यार्थी म्हणाला- “त्याची सर्व पात्रे जपानी असतात म्हणून !” कलाकार देश, भाषा, काळ यांची बंधने ओलांडतो तो असा. अखिल मानवजातीची सुखदुःखे आपल्या नाटकातून  चितारणारा शेक्सपिअर काय किंवा अखिल मानवजातीला आपल्या सुरांनी गहिवर आणणाऱ्या लतादीदी काय यांची जातकुळी एकच. यात डावं-उजवं कसं ठरवणार? आपलं-परकं कसं ठरवणार? मानवाचे अंती एक गोत्र- हेच खरे ! कलेसाठी कला की जीवनासाठी कला याचा खल ज्यांना करायचा त्यांनी खुशाल करावा. पण जगणं सुसह्य करेल, लौकिकातून वर उठवून क्षणभर का होईना, पण परतत्त्वाचा स्पर्श करवेल, ती खरी कला. बाकी केवळ कसबी कारागीरी! असंख्य गायक-गायिका यापूर्वी झालेत, यानंतरही होतील- पण ज्यांच्या सुराला परतत्त्वाचा स्पर्श लाभला ते लतादिदींसारखे कलावंत फार फार क्वचित निर्माण होतील.

सिनेमा शिवायही असंख्य प्रसंग लतादीदींच्या स्वरांनी अजरामर केले. ‘शिवकल्याण राजा’ हा अल्बम कोण विसरू शकेल? शिवरायांचा जयजयकार करायला त्याच  तोलाचे प्रतिभावंत हवेत. ते तसे एकाच काळात निर्माण होणे आणि एकत्र येणे हा देव दुर्लभ योग. पण तो आला आणि त्यातून निर्माण झालेला शिवकल्याण राजा हा संगीत अल्बम महाराष्ट्रसाठीच नव्हे तर अखिल मानवजातीसाठी अमूल्य ठेवा ठरला असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

कवी भूषण, राम गणेश गडकरी, वीर सावरकर, कुसुमाग्रज यांच्यासारखे महाकवी, संगीत द्यायला पंडित ह्रदयनाथ मंगेशकर, निवेदन साक्षात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आणि स्वर लतादीदींचा. यातून निर्माण झाले ते अजिंठा-वेरूळच्या तोडीचे स्वरशिल्प ! शिवकल्याण राजा मधले- ‘हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा’ हे शब्द एका श्वासात गाऊन ‘तेजा’ मधल्या ‘जा’ वर अत्यंत लीलया व सफाईदार अशी हरकत घ्यायला काय लागते हे- जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ! याच अल्बम मधला ‘गुणि बाळ असा, जागसि का रे वाया…’ हा राम गणेश गडकरी यांनी लिहिलेला शिवबाचा पाळणा, ‘हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा’ गाणाऱ्या लतादीदींनीच गायला आहे हे कोणाला खरे वाटेल? कुंद कहां, पयवृंद कहां  हे भूषण चे पद किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही कुसुमाग्रजांची अजरामर कविता यांना अमर करणे इतर कोणाला शक्य होते? ‘सरणार कधी रण’ ऐकतांना मूर्तिमंत बाजी प्रभू उभे करणे इतर कोणाला शक्य होते? ‘मोगरा फुलला’ हे शब्द लिहिताना ज्या ऊर्मी ज्ञानोबांच्या मनी दाटल्या असतील त्याच ऊर्मी ते शब्द लतादीदींच्या मुखातून बाहेर पडताना आपल्या अंतरी दाटतात. म्हणून त्या शब्दांचे ‘सूर’ झाले. ते शब्द न राहता ‘अक्षर’ ठरले. ‘तुम आशा विश्वास हमारे’ असे श्रीरामाला आळवताना अष्टसात्विक भाव जागृत व्हावेत ते लतादीदींच्या सुरांनीच! ‘आकाश के उस पार भी आकाश है’ हे अशियाई स्पर्धेसाठी लतादीदींनी गायलेले गीत आजही लाखो निराश तरुण तरुणींना प्रेरणा देते. ‘गगन सदन तेजोमय’ मधल्या ‘ते’ वरची मनाचा ठाव घेणारी हरकत ऐकून  ज्या तेजोमय भास्कराला ते गीत आळवते आहे, तोही क्षणभर आपला रथ थांबवून दाद दिल्याशिवाय राहिला नसेल. ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’ हे ज्ञानेश्वरांचे बोल लतादीदींच्या तोंडून येतात तेव्हा पळभर का होईना कोणाचे अवगुण  सांडीत नाहीत?

फ्रेंच राज्यक्रांती च्या दिवसांत आपण जन्मलो हे आपलं भाग्य होतं, पण त्यावेळी आपण तरुण होतो हे त्याहून मोठं भाग्य होतं- असं वर्डस्वर्थ म्हणाला होता. अगदी त्याच धर्तीवर लतादीदी गात असताना आपण त्यांना पाहू-ऐकू शकलो हे आपलं भाग्य आणि त्यांच्या गीतांना ऐकून आपलं तारुण्य मोहरलं हे त्याहून मोठं भाग्य असंच गेल्या पाऊण  शतकात जन्मलेल्या सर्वांना वाटत असेल. Song has the longest life असं कुण्या कवीने म्हटलं आहे. लतादीदी गात-गात स्वतःच गाणं होऊन गेल्या. म्हणूनच त्यांची गाणी आणि त्या स्वतःही चिरंजीव झाले आहेत. ‘धन्य ते गायनी कळा’ म्हणणारे समर्थ आज असते तर त्यापुढे- ‘धन्य गानकोकिळा’ असेही म्हटल्याशिवाय राहिले नसते.