“If man’s fate is to suffer in an unfriendly universe, Beethoven’s music creates the spirit to endure and even to exult in the endurance.”
फार पूर्वी एका पुस्तकात संगीतकार बीथोवेनवरच्या एका चरित्रात्मक लेखातल्या या ओळी आज लतादीदींच्या महाप्रयाणाच्या निमित्ताने खूप प्रकर्षाने आठवल्या. सोसणं हेच जर माणसाचं प्राक्तन असेल तर बीथोवेनचं संगीत ते सोसणं सुसह्य करतं, एवढंच नव्हे तर त्या सोसण्यातही आनंद निर्माण करतं. या बीथोवेनबाबतच्या ओळी लतादीदींच्या बाबतीतही अगदी सार्थ ठरतात. कोट्यावधी मनुष्यांची आयुष्यं फुलविणारा, कोट्यावधींचे जगणे सुसह्य करणारा, दैवी स्वर ज्या शरीरातून प्रकटायचा, ते शरीर निसर्गनियमानुसार आज पंचतत्वात विलीन झाले. दीनानाथ मंगेशकर नावाच्या या लोकोत्तर कलाकाराची ही कन्या आपल्या पित्याच्या कीर्तीलाही झाकोळत स्थिरचर व्यापून दशांगुळे उरली. ती जगापुढे आली तेच मुळी शूरा मी वंदिले गात. कोल्हापूरच्या पॅलेस थिएटरच्या रंगमंचावर परकर-पोलक्यातली चारचौघा मुलींसारखी दिसणारी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची ही कन्या फार तर एखादे बडबडगीत गाऊन कौतुकाची टाळी घेईल अशी अपेक्षा करणारा श्रोतृवृंद विजेच्या लखलखाटासारखा शूरा मी वंदिले म्हणत समेचा भेद करणारा स्वर ऐकून जो एकदा स्तिमित झाला तो पुढे चार पिढ्या तसाच स्तिमित होत राहिला. जन्मतःच रवीबिंब गिळायला झेपावणाऱ्या हनुमंतासारखीच ही झेप होती. ही देवाघरची देणी असतात. त्याला लौकिक मोजमापाच्या फूटपट्ट्या चालतच नाहीत. दिपून जाणे एवढेच तिथे आपल्या हाती असते. हृष्यामि च पुनःपुनः असे म्हणणार्या संजयासारखे आपण पुन्हा पुन्हा हर्षभरित होत राहतो.
पण याचा अर्थ लतादीदींचे मोठेपण पण केवळ जन्मजात किंवा देवदत्त होते असा नाही. ते विक्रमार्जित सत्व होते. ती स्वयमेव मृगेंद्रता होती. तपश्चर्येशिवाय मोठेपण मिळत नसते. महाभारतात- मोठेपण कशाने मिळते? या यक्षाच्या प्रश्नाला उत्तर देताना युधिष्ठिर म्हणतो- तपसेन महता पदम्– म्हणजे तपश्चर्येने मोठेपण मिळते. लता मंगेशकरांना मोठेपण सहज मिळाले नाही. कष्टाचे डोंगर उपसत, व्रतस्थ जीवन जगत आणि स्वार्थ बाजूला ठेवून जे खडतर आयुष्य त्या जगल्या त्याची कल्पना फार फार थोड्या लोकांना असेल. आठ दशके, छत्तीस भाषांमधून विविध प्रकारची हजारो गाणी गायची- आणि ती सुद्धा दर्जाशी कुठलीही तडजोड न करता- हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. ज्या भाषेत गायचे, त्या भाषेच्या शब्दांचे उच्चार अचूक व सफाईदार आलेच पाहिजेत असा कटाक्ष ठेवून लतादीदी गायिल्या. म्हणून हिंदी-मराठी श्रोत्यांना त्या जितक्या आपल्या वाटतात, तितक्याच सिंहली किंवा तमिळ श्रोत्यांनाही आपल्याच वाटतात. हिंदी सिनेमासाठी गायचे तर उर्दू उच्चार अचूक हवेत म्हणून संगीतकार नौशाद यांच्या आग्रहाखातर त्या उर्दू शिकल्या. मुगले-आजम सारख्या अभिजात चित्रपटाची गाणी इतक्या अचूक उर्दू उच्चारांसह गाणारी ही गायिका मराठी भाषिक आहे हे अनोळखी माणसाला सांगूनही खरे वाटणार नाही.
एका इंग्रज प्राध्यापकाने एका जपानी विद्यार्थ्याला एकदा विचारले- “बाळा तुला शेक्सपियर का आवडतो?” त्यावर तो जपानी विद्यार्थी म्हणाला- “त्याची सर्व पात्रे जपानी असतात म्हणून !” कलाकार देश, भाषा, काळ यांची बंधने ओलांडतो तो असा. अखिल मानवजातीची सुखदुःखे आपल्या नाटकातून चितारणारा शेक्सपिअर काय किंवा अखिल मानवजातीला आपल्या सुरांनी गहिवर आणणाऱ्या लतादीदी काय यांची जातकुळी एकच. यात डावं-उजवं कसं ठरवणार? आपलं-परकं कसं ठरवणार? मानवाचे अंती एक गोत्र- हेच खरे ! कलेसाठी कला की जीवनासाठी कला याचा खल ज्यांना करायचा त्यांनी खुशाल करावा. पण जगणं सुसह्य करेल, लौकिकातून वर उठवून क्षणभर का होईना, पण परतत्त्वाचा स्पर्श करवेल, ती खरी कला. बाकी केवळ कसबी कारागीरी! असंख्य गायक-गायिका यापूर्वी झालेत, यानंतरही होतील- पण ज्यांच्या सुराला परतत्त्वाचा स्पर्श लाभला ते लतादिदींसारखे कलावंत फार फार क्वचित निर्माण होतील.
सिनेमा शिवायही असंख्य प्रसंग लतादीदींच्या स्वरांनी अजरामर केले. ‘शिवकल्याण राजा’ हा अल्बम कोण विसरू शकेल? शिवरायांचा जयजयकार करायला त्याच तोलाचे प्रतिभावंत हवेत. ते तसे एकाच काळात निर्माण होणे आणि एकत्र येणे हा देव दुर्लभ योग. पण तो आला आणि त्यातून निर्माण झालेला शिवकल्याण राजा हा संगीत अल्बम महाराष्ट्रसाठीच नव्हे तर अखिल मानवजातीसाठी अमूल्य ठेवा ठरला असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
कवी भूषण, राम गणेश गडकरी, वीर सावरकर, कुसुमाग्रज यांच्यासारखे महाकवी, संगीत द्यायला पंडित ह्रदयनाथ मंगेशकर, निवेदन साक्षात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आणि स्वर लतादीदींचा. यातून निर्माण झाले ते अजिंठा-वेरूळच्या तोडीचे स्वरशिल्प ! शिवकल्याण राजा मधले- ‘हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा’ हे शब्द एका श्वासात गाऊन ‘तेजा’ मधल्या ‘जा’ वर अत्यंत लीलया व सफाईदार अशी हरकत घ्यायला काय लागते हे- जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ! याच अल्बम मधला ‘गुणि बाळ असा, जागसि का रे वाया…’ हा राम गणेश गडकरी यांनी लिहिलेला शिवबाचा पाळणा, ‘हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा’ गाणाऱ्या लतादीदींनीच गायला आहे हे कोणाला खरे वाटेल? कुंद कहां, पयवृंद कहां हे भूषण चे पद किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही कुसुमाग्रजांची अजरामर कविता यांना अमर करणे इतर कोणाला शक्य होते? ‘सरणार कधी रण’ ऐकतांना मूर्तिमंत बाजी प्रभू उभे करणे इतर कोणाला शक्य होते? ‘मोगरा फुलला’ हे शब्द लिहिताना ज्या ऊर्मी ज्ञानोबांच्या मनी दाटल्या असतील त्याच ऊर्मी ते शब्द लतादीदींच्या मुखातून बाहेर पडताना आपल्या अंतरी दाटतात. म्हणून त्या शब्दांचे ‘सूर’ झाले. ते शब्द न राहता ‘अक्षर’ ठरले. ‘तुम आशा विश्वास हमारे’ असे श्रीरामाला आळवताना अष्टसात्विक भाव जागृत व्हावेत ते लतादीदींच्या सुरांनीच! ‘आकाश के उस पार भी आकाश है’ हे अशियाई स्पर्धेसाठी लतादीदींनी गायलेले गीत आजही लाखो निराश तरुण तरुणींना प्रेरणा देते. ‘गगन सदन तेजोमय’ मधल्या ‘ते’ वरची मनाचा ठाव घेणारी हरकत ऐकून ज्या तेजोमय भास्कराला ते गीत आळवते आहे, तोही क्षणभर आपला रथ थांबवून दाद दिल्याशिवाय राहिला नसेल. ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’ हे ज्ञानेश्वरांचे बोल लतादीदींच्या तोंडून येतात तेव्हा पळभर का होईना कोणाचे अवगुण सांडीत नाहीत?
फ्रेंच राज्यक्रांती च्या दिवसांत आपण जन्मलो हे आपलं भाग्य होतं, पण त्यावेळी आपण तरुण होतो हे त्याहून मोठं भाग्य होतं- असं वर्डस्वर्थ म्हणाला होता. अगदी त्याच धर्तीवर लतादीदी गात असताना आपण त्यांना पाहू-ऐकू शकलो हे आपलं भाग्य आणि त्यांच्या गीतांना ऐकून आपलं तारुण्य मोहरलं हे त्याहून मोठं भाग्य असंच गेल्या पाऊण शतकात जन्मलेल्या सर्वांना वाटत असेल. Song has the longest life असं कुण्या कवीने म्हटलं आहे. लतादीदी गात-गात स्वतःच गाणं होऊन गेल्या. म्हणूनच त्यांची गाणी आणि त्या स्वतःही चिरंजीव झाले आहेत. ‘धन्य ते गायनी कळा’ म्हणणारे समर्थ आज असते तर त्यापुढे- ‘धन्य गानकोकिळा’ असेही म्हटल्याशिवाय राहिले नसते.