कल्पतरूंचे आरव …

आज २३ एप्रिल. जागतिक पुस्तक दिन. भाषाप्रभू शेक्सपिअरची जयंती व पुण्यतिथी दोन्ही. त्याच्याच गौरवार्थ/ स्मरणार्थ आजचा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.

माणसांनी पुस्तके निर्माण केली आणि पुस्तकांनीही माणसे घडविली. माणूस आणि पुस्तके यांच्यात असे एक रम्य अद्वैत आहे. पुस्तकांनी माणसाला काय दिले नाही? ज्ञान तर दिलेच, पण सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या जीवाला दिलासा दिला, त्याला विरंगुळा दिला, त्याच्या जखमांवर फुंकर घातली, तर कधी निराश मनाला उभारी दिली. सृजन ही माणसाची आदिम प्रेरणा आहे. त्याला सतत व्यक्त व्हावेसे वाटते. सर्जनातूनच तो व्यक्त होतो. ‘मुझे कुछ कहना है’-  मला काही सांगायचंय – या सनातन उर्मीतून अभिव्यक्ती येते. मग कुणी कुठल्या तर कुणी कुठल्या माध्यमातून व्यक्त होतो. कुणी गातो, कुणी चित्रे काढतो, कुणी कविता करतो, कुणी कथा-कादंबऱ्या लिहितो, कुणी व्याख्यान देतो तर कुणी नुसते  गप्पांचे फडच रंगवतो. कितीतरी तऱ्हा अभिव्यक्तीच्या ! अगदी सकाळी तुळशीवृंदावनाजवळ रांगोळी काढणाऱ्या गृहिणीलासुद्धा त्यातून काही सांगायचे असते. Continue reading

कशी मिळवावीत चांगली पुस्तके? हे वाचा …

ग्रंथसंग्रह कसा व कुठून करावा, नव्या जुन्या पुस्तकांची माहिती कुठून मिळवावी यासाठी काही संपर्कस्थानांची माहिती सर्वांकरीता खाली देत आहे. ही माहिती परिपूर्ण अर्थातच नाही. पण सुरुवात करता येईल अशी मात्र आहे.

ऑनलाईन बुकस्टोअर्स

  • हिंदी पुस्तकांसाठी:
    1. भारतीय ज्ञानपीठ – jnanpith.net
    2. in
    3. Gita Press, Gorakhpur
  • संस्कृत पुस्तकांसाठी:
    1. मोतीलाल बनारसीदास – mlbd.in
    2. Exotic India – exoticindia.com/book

पुस्तकांशी संबंधित ब्लॉग्ज, फेसबुक ग्रुप, पेजेस इत्यादी

  • पुस्तक बिस्तक (FB Group)
  • दुर्मिळ पुस्तके (FB Group)
  • राजहंस, मेहता, लोकवाङ्मय गृह प्रकाशन, Majestic, पॉप्युलर रोहन या प्रकाशनांचे फेसबुक पेजेस व वेबसाईट

पुस्तकांशी संबंधित नियतकालिके, पुस्तक परीक्षणे देणारी नियतकालिके इत्यादी :

  • इंग्रजी:
    1. Biblio- A Review of Books https://www.biblio-india.org/
    2. Times Literary Supplement
    3. London Review of Books
    4. New York Times Book Review
    5. New York Review of Books
    6. Kirkus Review
  • मराठी:
    1. ललित मासिक – Majestic Prakashan
    2. आपले वाङ्मयवृत्त – लोकवाङ्मय गृह प्रकाशन
    3. रोहन साहित्य मैफल
    4. मेहता मराठी ग्रंथजगत
    5. राजहंस बुक क्लब व त्याचे मासिक
  • हिंदी : ज्ञानपीठ समाचार
  • संस्कृत: MLBD Newsletter (Motilal Banarasidas)

Wear the old coat and buy a new book- Austin Phelps

हवीहवीशी पुस्तके :विस्मृतीत गेलेल्या काही पुस्तकांबद्दल थोडेसे…

Image result for booksवाचनाचा आवाका जसाजसा वाढतो, तसातसा अनेक पुस्तकांसोबत परिचय होतो. काहींशी गाढ मैत्री होते, काही जुन्या नव्या पुस्तकांबद्दल माहिती मिळत जाते आणि वाचनानंद वर्धिष्णू होत जातो.

काही जुन्या पुस्तकांबद्दल माहिती मिळते, त्यांना वाचायची इच्छासुद्धा होते, पण अनेकदा ती पुस्तके दुर्मिळ झालेली असतात किंवा अनुपलब्ध असतात. अशा वेळी त्यांच्याबद्दल वाटणारी ओढ अधिकच वाढते. त्यांना काहीही करून मिळवायची इच्छा होते. मग मी वळतो इंटरनेट कडे. अनेकदा अशी पुस्तके कुठल्यातरी ऑनलाइन अभिलेखागारात अथवा गूगल बुक्स सारख्या संकेत स्थळावर ई-बुकच्या स्वरुपात आढळतात. कधीकधी जुनी पुस्तके विकणाऱ्या ऑनलाइन बुकस्टोअर मध्ये सापडतात तर कधी कुठल्या तरी ग्रंथालयात किंवा जुनी पुस्तके विकणारांकडे सापडतात. मात्र अनेकदा कुठेच सापडत नाहीत. हवे असलेले दुर्मिळ पुस्तक सापडल्यावर होणारा आनंद वेगळाच. मात्र अशा वेळी या पुस्तकाची आवृत्ती आज प्रकाशनात हवी होती असे वाटल्यावाचून राहत नाही.

आज मी अशाच काही मराठी व इंग्रजी पुस्तकांबद्दल लिहीणार आहे, जी आज फक्त ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहेत किंवा मुळीच उपलब्ध नाहीत, पण ज्ञानाच्या क्षेत्रात ज्यांचे मोल आहे आणि त्यांची आवृत्ती प्रकाशनात असणे माझ्या व माझ्यानंतरच्या पिढयांसाठी उपकारक आहे.

मी आयुष्यात वाचलेले पहिले गंभीर (व मोठे) पुस्तक म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे शिवचरित कथनमाला. पाचव्या वर्गाची परीक्षा पास झाल्यानंतर बाबांचे कपाट धुंडाळतांना हे पुस्तक अवचित हाती लागले अन मग त्याने मनाचा ताबा कधी घेतला हे काही कळलेच नाही. पत्रकार गजानन खोले यांनी संकलित केलेले बाबासाहेबांच्या शिवचरित्रावरील व्याख्यानांचे हे पुस्तक पुण्याच्या इंद्रायणी साहित्य प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते. पुढे राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांनी लिहिलेले चरित्र वाचण्याचाही योग आला. पण कथनमालेत त्यामानाने अधिक तपशील होते व ते अधिक रंजकही होते. मला आठवते, कवी भूषणाचे पूर्वायुष्य, त्याचा त्याच्या वहिनीशी स्वयंपाकातील मिठावरून झालेला वाद व पुढे भूषणाच्या प्रसिद्धी मिळविण्याची कथा- या सगळ्या व अशांसारख्या अनेक रंजक तपशीलांनी शिवचरित कथनमाला भरलेली आहे. आज हे पुस्तक माझ्याजवळ नाही. खूप धुंडाळले. इंटरनेट वर शोधले. प्रकाशकांकडेही चौकशी केली, पण गेली अनेक वर्षे हे पुस्तक आवृत्तीत नसल्यांचे कळते. आता काही ग्रंथालयात त्याचा जुन्या प्रती शिल्लक आहेत, तेवढ्याच.

हे पुस्तक प्रकाशनात असावे असे प्रकर्षाने वाटते. यावर वाचकांच्या उड्या पडतील हे मात्र निश्चित. इंद्रायणी साहित्त्य प्रकाशनानेच हे कार्य शक्य तितक्या लवकर करावे असे विनम्रपणे सुचवावेसे वाटते.

१८५७ ची शिपाई गर्दी हे आज प्रा. नरहर रघुनाथ फाटक यांचे पुस्तकही अत्यंत दुर्मिळ झालेल्या पुस्तकांच्या श्रेणीत येते. १९५७ साली १८५७ च्या उठावाला शंभर वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची वेगळी मीमांसा करणारे प्रा. फाटकांचे हे पुस्तक आहे. १८५७ चा उठाव हा स्वातंत्र्यसमर नसून केवळ शिपाईगर्दी होती असे या पुस्तकातील फाटकांचे मत अत्यंत वादग्रस्त ठरले. कठोर वैचारिक शिस्तीचा, भरपूर पुराव्यांनिशी विषयांची मांडणी करणारा नामूलं लिख्यते किंचित हे व्रत कसोशीने पाळणारा अभ्यासक म्हणून प्रा. फाटक प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या पुस्तकाने महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली. आचार्य अत्र्यांनी तर फाटकांविरुद्ध आघाडीच उघडली. चित्रशाळा प्रेसने १९५७ साली प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची प्रत मलातरी आज कुठेही आढळली नाही. ई-बुक स्वरुपात तर राहोच पण मी DELNET, Digital Library of India अशा ग्रंथालयाच्या जालांमध्येही शोध घेतला. पण कुठल्या ग्रंथालयामध्येही हे पुस्तक आढळले नाही.

मला या पुस्तकाबद्दल प्रचंड कुतूहल आहे. फाटकांनी आपल्या मताच्या समर्थनार्थ काय पुरावे दिले असतील व कसा युक्तिवाद केला असेल हे जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. २००७ साली १८५७ च्या उठावाला दीडशे वर्षे पूर्ण झाली. त्या वेळी सुद्धा या पुस्तकाची आवृत्ती निघाली नाही. आतातरी कुठल्यातरी प्रकाशकाने या पुस्तकाची आवृत्ती काढून एक महत्वपूर्ण पुस्तक विस्मृतीत जाण्यापासून वाचवावे. फटकांशी स्नेहबंध असलेले मुंबई मराठी साहित्य संघ हे करेल काय ?

सेतुमाधवराव पगडी यांचे इतिहास आणि कल्पित हे असेच एक दुर्मिळ झालेले अप्रतिम पुस्तक. ललित साहित्यातून अनेकदा चुकीचा इतिहास मांडला जातो. साहित्यिक कधी कधी अवाजवी स्वातंत्र्य घेतात. सेतुमाधवरावांनी आपल्या नर्म विनोदी, खुसखुशीत शैलीत अनेक ललित साहित्यकृतींचा परामर्श घेऊन खरा इतिहास कथन करीत सामान्य वाचकांच्या ज्ञानात भर घातली आहे. ललित साहित्यात संभाजी महाराजांवर झालेला अन्याय, राणी पद्मिनीची कहाणी व त्या मागचे सत्य, घाशीराम कोतवाल प्रकरण या व अशांसारख्या अनेक बाबींवर सप्रमाण असा प्रकाश पगडींनी टाकला आहे. या शिवाय इतिहास संशोधन करतांना आलेले मजेदार अनुभव तसेच इतरही काही मनोरंजक स्फुट लेख या संग्रहात आहेत. माझ्या वडिलांच्या महाविद्यालयातील ग्रंथालयातून आणलेले हे पुस्तक मी दोनदा वाचले आहे. शेवटचे २००४ साली वाचले. त्याची अवीट गोडी अजून स्मरते. आज हे पुस्तक प्रकाशनात नाही. अलिकडे हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदेने प्रकाशित केलेल्या समग्र सेतुमाधवराव पगडी च्या खंडांमध्ये हे पुस्तक आहे. पण त्याची स्वतंत्र आवृत्ती निघणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे.

Continue reading

ग्रंथोपजीवी लोकशिक्षक

Image result for govind talwalkar

गोविंदराव तळवलकर गेले आणि समाजपुरुषाचा एक आधारच हरवला. वयाची एक्क्याण्णव वर्षे त्यांनी पूर्ण केली होती. म्हणजे त्यांचे जाणे अकाली नव्हतेच. पण तरीही घरातलं एक वडिलधारं माणूस गेल्याची भावना महाराष्ट्राची झाली. एक संपादक हा सतत जागता राहणारा व इतरांनाही जागृत ठेवणारा व्रतस्थ प्रहरी असतो. निदान तो तसा असावा अशी अपेक्षा असते. गोविंदराव असेच होते. संपादक म्हणून सतत सत्याची, न्यायाची पाठराखण करण्याचे व्रत तर त्यांनी पाळलेच, पण याहीपलीकडे संपादक हा एक लोकशिक्षकही असतो, लोकांना सतत शिक्षित करण्याचेही कर्तव्य त्याने केले पाहिजे, त्यासाठी स्वतः व्यासंग केला पाहिजे हे स्वतः उमजून तसे त्यांनी केले हे त्यांचे खरे मोठेपण. त्यांचे अफाट व अद्ययावत वाचन, डोळे दिपवणारा ग्रंथसंग्रह व या सर्वाना साजेशी उच्च दर्जाची अभिरुची यात त्यांचे एक लोभस वेगळेपण होते.

मी गोविंदराव तळवलकरांचा एक सामान्य चाहता. महाराष्ट्र टाईम्स चा वाचकही नव्हतो. एक दिवस पुलंच्या ‘आपुलकी’ मधील ‘अग्रलेखक गोविंदराव तळवलकर’ हे व्यक्तिचित्र वाचले आणि अक्षरशः दिपलो. असा व्यासंग, असे वाचन आणि असा अफाट ग्रंथसंग्रह असलेला माणूस आजच्याच काय, कुठल्याही युगात एकूणच दुर्मिळ. मग एक दिवस गोविन्दरावांचे सौरभ खंड -१ हे पुस्तक हाती आले. वाचायला सुरुवात केली आणि अधाशासारखा वाचतच गेलो. इतक्या सोप्या आणि ओघवत्या शैलीत प्रसादासारखा वाटून दिलेला वाचनानंद खूपच सुखावून गेला. लहान मुलाला गोष्टीतले चॉकलेटचे झाड खरोखरच सापडावे व तेही बारमाही फळणारे असावे तसे वाटले. मग गोविंदरावांच्या इतर पुस्तकांचा ऑनलाइन व ऑफलाईन शोध घेणे व ती पुस्तके मागवणे सुरु केले. सौरभ खंड २, वाचता वाचता खंड २, पुष्पांजली खंड २, भारत आणि जग, सत्तांतरचे तिन्ही खंड, बदलता युरोप, बाळ गंगाधर टिळक, वैचारिक व्यासपीठे, मंथन ही सर्व पुस्तके संग्रहात दाखल केली आणि अथपासून इतिपर्यंत वाचून काढली. काही पुस्तके सहज मिळाली तर काही मिळवताना त्रास झाला आणि काही (उदा. वाचता वाचता खंड १, ग्रंथसंगती, पुष्पांजली- खंड १, नौरोजी ते नेहरू ही) पुस्तके उपलब्ध झालीच नाहीत. आवृतीत नसल्यास यांची नवी आवृत्ती त्यांच्या प्रकाशकांनी काढावी अशी गोविंदरावांच्या अनेक चाहत्यांतर्फे माझी आग्रहाची विनंती आहे.

पुस्तकेच नव्हे, तर गोविंदरावांचे वेळोवेळी ललित, मौज, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स आदि वृत्तपत्रे व नियतकालिकांमधध्ये येणारे विविध विषयांवरचे लेख वाचायला कधीच चुकत नव्हतो. लोकसत्ता व ललित यांचा मी मुख्यत्वे गोविंदरावांच्या लिखाणासाठीच वर्गणीदार झालो हे सत्य आहे. अगदी या मार्च महिन्याच्या ललित मध्ये सुद्धा ग्लास आर्मोनिका या वाद्याचा इतिहास कथन करणाऱ्या पुस्तकाचा परिचय त्यांनी करून दिला होता. तो लेख वाचल्यावर याही वयात सुरु असलेला त्यांचा व्यासंग बघून थक्कच झालो आणि मनात म्हटले, “परमेश्वरा, हा निर्झर आम्हाला तृप्त करण्यासाठी आणखी खूप वर्षे वाहू दे.” पण तसे व्हायचे नव्हते. अखेर वार्धक्याने कालपुरुषाला शरणागती दिलीच आणि हा ज्ञानयोगी जिथून आला होता तिथे परतला.

संपादक म्हणून गोविंदराव किती थोर होते यावर मी लिहिणार नाही कारण तो माझा अधिकार नाही. पण एक जबरा वाचक व वाचनाचा आनंद भंडाऱ्यासारखा उधळून सर्वांना त्यात रंगवून टाकणारा व्यासंगी लेखक म्हणून त्यांचे गारुड अगदी माझ्या पिढीपर्यंतसुद्धा (म्हणजे जवळजवळ सत्तर वर्षे) कायम होते आणि आहे व पुढेही राहील. काय वाचावे, का वाचावे, कसे वाचावे व वाचून झाले म्हणजे मग पुढे काय करावे याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला होता. त्यांच्यासारखेच दुसरे व्यासंगी व ग्रंथवेडे संपादक म्हणजे टाईम्स ऑफ इंडिया चे शामलाल. तेही दीर्घायुषी ठरले. ‘सौरभ’ मध्ये शामलाल यांच्या ‘इंडियन रियालिटीज इन बिट्स अँड पीसेस’ या पुस्तकाचा परिचय करून देताना त्यांनी शामलाल यांच्या व्यासंगाचा, ग्रंथप्रेमाचा व त्यांच्यातल्या एका साक्षेपी समीक्षकाचा केलेला गौरव हा स्वतः गोविंदरावांनाही अगदी तंतोतंत लागू पडतो.

शेक्सपिअर हे त्यांचे अक्षय आनंदनिधान होते. गेल्या वर्षी शेक्सपिअर च्या मृत्यूला ४०० वर्षे झाली. त्यानिमित्ताने त्यांनी ‘शेक्सपिअर: एक वेगळा अभ्यास’ व ‘शेक्सपिअर: जगाचा नागरिक’ हे दोन उत्कृष्ट लेख क्रमशः ललित व लोकसत्ता मध्ये लिहीले. गेल्या दिवाळीतही मौज व लोकसत्ता च्या दिवाळी अंकांत नेताजींच्या मृत्यूबद्दल व दुस-या महायुद्धात जपान्यांनी केलेल्या राक्षसी अत्याचारांबद्दल त्यांनी लिहिले होते. मला स्वतःला त्यांचे ‘वैचारिक व्यासपीठे’ हे पुस्तक फार फार आवडते. कारण माझ्या मते जगभरातील उत्तमोत्तम व समृद्ध अशा नियतकालीकांचा परिचय करुन देणारे मराठीत तरी हे एकमेव पुस्तक आहे आणि हा परिचय करून देण्याचा अधिकारही गोविन्दरावांनाच होता; नव्हे तो त्यांनी कमावला होता. साम्यवादी इतिहास व विचारधारा यांचा इतका साक्षेपी अभ्यास मराठी तर सोडाच पण इतर भाषांतही क्वचितच केलेला आढळेल. हा विचार एकीकडे करत असतानाच एक रसिक म्हणून सोवियत साम्यवादाचा जनक लेनिन कसा होता हेही गोविंदराव तमारा डॉयश्चर या लेखिकेच्या ‘द अदर लेनिन’ या पुस्तकाच्या आधारे आपल्याला दाखवून द्यायला विसरत नाहीत. इतका सूक्ष्म व्यासंग किती लोक करू शकतात?

‘दिसामाजी काही तरी ते लिहावे | प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’ हा समर्थांचा उपदेश आयुष्यभर कसोशीने आचरणात आणणा-या मोजक्या विद्वानांत गोविंदराव होते. ज्यांना ख-या अर्थाने पब्लिक इंटेलेक्चुअल म्हणावे असा हा लोकशिक्षक, समाजमन निकोप ठेवण्यासाठी झटणारा निर्भीड प्रहरी या जगाला खूप हवा असतानाच निघून गेला आहे याचेच वैषम्य वाटते. पण मर्त्य शरीराला आयुष्याच्या मर्यादा असतातच. त्याला इलाज नसतो. आपल्याला गोविंदराव लाभले हे आपले भाग्य. असा व्यासंगी आता होणे नाही. त्यांच्या आवडत्या शेक्सपिअरचे हे शब्द त्यांना तंतोतंत लागू पडतात:

He was a man, take him all in all
We shall not look upon his like again